दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
भंडारदर्यातून 8 फेब्रुवारीपासून शेती व पिण्यासाठी आवर्तन
अकोले : भंडारदरा लाभक्षेत्राकरिता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन शनिवारपासून (दि.8 फेब्रुवारी) सोडण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी तसेच उन्हाची वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागाने 8 फेब्रुवारी 2025 सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे.
लाभक्षेत्रातील शेतकर्यांची मागणी आणि उन्हाची वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
या आवर्तनाचा लाभ रब्बी पिकांना होईल; परंतु या बरोबरीने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे. या आवर्तनाचा या गावांनाही लाभ व्हावा, या उद्देशाने सिंचन आणि बिगर सिंचन असे एकत्रित आवर्तन सोडण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी विभागाला दिल्या आहेत
उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी घ्यावी, तसेच शेतकर्यांनीही पाण्याचा योग्य विनियोग करावा, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.