दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
पुलाच्या उद्घाटनावरून राजकीय वादाची ठिणगी?
संगमनेर :
गेल्या दोन वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या संगमनेर शहरातील प्रवरा नदी परिसराला जोडणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम आठ दिवसांत पूर्ण होईल. याच महिन्यात पुलाचे उद्घाटन होवून तो वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती संगमनेर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. दरम्यान, संगमनेरकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या या पुलाच्या उद्घाटनावरून पुन्हा राजकीय ठिणगी पाडणार का, याकडे लक्ष आहे.
संगमनेर शहरातील म्हाळुंगी व प्रवरा नदीवरील परिसराला जोडण्याचे काम हा पूल करत होता. प्रवरा नदी, साई मंदिर, ओहरा कॉलेज, साईनगर, पंपिंग स्टेशन मालपाणी हेल्थ क्लब सह परिसरासाठी म्हाळुंगी नदीवरील पूल महत्त्वाचा आहे. दररोज हजारो नागरिक या पुलावरून ये-जा करत
असतात. मात्र गेल्या अडीच वर्षांपूर्वी हा पूल खचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय झाली. या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकात नाराजी पसरली होती.
हा पूल पुन्हा नव्याने बांधावा यासाठी नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. पालिकेवर मोर्चा, निवेदन देणे, उपोषण यासारखे मार्ग अवलंबण्यात आले. दीड वर्षापासून या पुलाच्या बांधकाम कामावरून राजकारण सुरू होते. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावर चांगलेच राजकारण केले. निधी कसा व कोठून आणणार यावरून आरोप प्रत्यारोप करण्यात आले.
मात्र विधानसभा निवडणूक लागल्याने या पुलाच्या कामाला विशेष महत्त्व आले. तत्कालीन महसूल मंत्री व सध्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या पुलाच्या कामाचे उद्घाटन झाले. पालिकेकडे असणारा इतर निधी या पुलाच्या कामाला वळविण्यात आला. आता या पुलाचे काम अंतिम टप्यात आले असून आठ दिवसांत काम पूर्ण होईल व याच महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, अशी आशा संगमनेरकराना आहे. मात्र या पुलाच्या उद्घाटनावरून पुन्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या संगमनेरात होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी महायुतीने तयारी सुरू केली आहे.