चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      संगमनेरात वॉर्ड रचनेच्या कामाला गती !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |      अनिल शिंदे यांना बंधू शोक     |     
चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह By Admin 2025-07-04

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेऊन आपल्या पाल्यांना आधार दिला.


पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज (शुक्रवारी) सकाळी चंदनेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसला भीषण अपघात होऊन चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदनेश्वर विद्यालयाची एम.एच. १४ बी.ए. ८९३२ क्रमांकाची बस साकुर आणि आसपासच्या भागातून सुमारे ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. याच दरम्यान, समोरून येणाऱ्या एका वाहनाने हुल दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या साईट गटारात पलटी झाली.अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस हवालदार अमित महाजन आणि डोळासने महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत जखमी विद्यार्थ्यांना चंदनापुरी घाटावरील गुंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेऊन आपल्या पाल्यांना आधार दिला.या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शहरांमधील शाळांमध्ये आणण्यासाठी अनेक शाळा प्रयत्नशील असतात, मात्र या स्कूल बसेस शासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि अटींचे पालन करतात का, याबाबत अनेकदा शंका उपस्थित होते.

सद्यस्थितीत अनेक स्कूल बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले जातात, तसेच वाहनांच्या देखभालीसंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण होते. परिवहन विभागाने आणि आरटीओने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व बसेसची कसून तपासणी करणे, त्या सुसज्ज आहेत की नाही याची खात्री करणे, आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.