दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
काँग्रेसने देश उभा केला, भाजपने जातीयता वाढवली
संगमनेर (प्रतिनिधी) -- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाळा ,महाविद्यालय, रस्ते, धरणे, दवाखाने या सर्व सुविधांसह सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम काँग्रेसने केले. याउलट विविध जाती जातींमध्ये भांडणे लावून राजकारण करणाऱ्या कौरव रुपी भाजपाने अकरा वर्षांमध्ये एकही काम केले नसल्याची टीका काँग्रेसचे हनुमंत पवार यांनी केली असून युवकांनी भाजपाच्या खोट्या प्रचाराला जशास तसे उत्तर द्या असे आवाहन केले.
द्रोणागिरी हॉलमध्ये युवक काँग्रेसच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, लेखक रोहित तावरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हनुमंत पवार म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी चाळीस वर्षे अथक प्रयत्न करून हा तालुका उभा केला. संगमनेर तालुका आज सुजलम सुफलाम दिसतो आहे. त्यामागे त्यांचे कष्ट आहे. जनतेसाठी हा लोकनेता चाळीस वर्षे राबतो आहे. हे त्यांना दिसत नाही .काय केले हा प्रश्न विचारताना तुम्ही काय केले हे त्यांना विचारा.
काँग्रेस पक्षाने 40 वर्षात देश उभा केला .धरणे, आयआयटी ,शिक्षण संस्था ,सहकार, शेती, औद्योगीकरण, दवाखाने ही सर्व निर्मिती काँग्रेसच्या काळात झाली आहे. काँग्रेसने कधीही भेदभावाचे राजकारण केले नाही. देश उभा केला. 26 मोफत लस साठ वर्ष काँग्रेसने जनतेला दिले कधीही जाहिरात बाजी केली नाही. याउलट भाजपने एक कोरोनाची लस दिली तर त्यावर प्रत्येक ठिकाणी जाहिरात केली. मागील अकरा वर्षात एक तरी नवीन उद्योग आला का असा सवाल करताना जातीमध्ये भेदभाव करून दंगली निर्माण केल्या. भाजप हा कौरवरुपी पक्ष आहे. सातत्याने खोटं बोलणारा आणि फेक निरीटिव्ह करणारा हा पक्ष असून त्यांना तोडीच तोड उत्तर द्या. कारण काँग्रेसने खूप काम केले आहे. परंतु युवक मांडत नाहीत .भाजप हे वस्तुस्थिती सोडून जनतेला भरकटत असून ते घाबरत आहेत.
राज्यामध्ये 77 लाख कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर बांधवांचे थकवले आहेत. दहा लाख कोटींचे कर्ज राज्यावर झाले आहे. पत्रकारिता आता बंधनात आहे. पंतप्रधानांना अकरा वर्षात एक सुद्धा पत्रकार परिषद घेता आले नाही. नथुरामाचे उदातीकरण करणारे हे लोक असून यांनी कधीही विकासाचे काम केले नाही .काँग्रेस पक्षाने सहकारातून ग्रामीण भागात समृद्धी निर्माण केली. हा महाराष्ट्र घडवला. याउलट महाराष्ट्रात ड्रग्स आणि अमली पदार्थ वाढवण्याचे काम महायुती सरकार करत असून युवक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार आणि केलेली कामे तळागाळापर्यंत पोहोचवा .व्हाट्सअप वरच्या चर्चेला घाबरू नका सोशल मीडियावर तोडीस तोड उत्तर द्या असे आवाहन त्यांनी केले.