लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मधील वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत केली होती चिंता व्यक्त
By Admin 2025-10-29
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरची घडी विस्कटते, नागरिक हवालदिल : राजकीय दबावातून अवैध धंद्यांना चालना
संगमनेर ( प्रतिनिधी ) शांत,सुसंस्कृत आणि वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरात मागील एक वर्षापासून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून अवैध धंदे वाढले आहेत. दादागिरी, दहशतवादी सह अमली पदार्थांची होणारी तस्करी हा नागरिकांमध्ये भीतीचा विषय झाला असून या परिस्थितीबाबत महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली होती.
सर्व पत्रकारांशी संवाद साधताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा आपण परिवार म्हणून जपला. सर्वधर्मसमभाव आणि मानवता धर्म जपत प्रत्येकाला विकासाची संधी दिली. सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. शिक्षण, सहकार, ग्रामीण विकास,शेती, दुग्धव्यवसाय यामधून तालुका फुलवला. कधीही भेदभाव केला नाही. कधीही जातिवाद केला नाही. सातत्याने विकासाची कामे केली.मात्र प्रसिद्धी केली नाही. निवडणुका येतात जातात. जनता आणि सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे. त्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे.हे संस्कार आपले आहेत.
मात्र संगमनेर मध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. ड्रग्स हा विषय अत्यंत अवघड असून संगमनेर मध्ये या विषयाने प्रवेश केला असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे. याबाबत सर्व नागरिकांनी सजग व्हावे. विशेषता पत्रकारांनी आवाज उठवावा असे आव्हानही त्यांनी केले होते. तरुण पिढी हे आपले भविष्य आहे त्यांच्या हाती काम देण्याऐवजी जातीयवाद वाढवून राजकारण केले जात आहे हे चुकीचे आहे. ही पद्धत आणि परंपरा संगमनेरमध्ये कधीही नव्हती.