संगमनेर, दि. १८ ऑगस्ट,
(प्रतिनिधी) स्वातंत्र्योत्सव सप्ताह निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संगमनेर शहरात ३०० फूट लांबीच्या तिरंग्यासह भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत तब्बल एक हजारांहून अधिक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
मालपाणी लॉन्स येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा संगमनेर स्टेडियमपर्यंत पार पडली. हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या माध्यमातून विद्यार्थी परिषदेकडून तरुणांमध्ये देशभक्तीची जाणीव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
या पदयात्रेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह ज्ञानेश्वर थोरात, विद्यार्थी परिषदेचे जिल्हाप्रमुख अरुण लेले सर व शहर मंत्री हर्ष खोल्लम आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण पदयात्रेमुळे शहर देशभक्तीच्या घोषणांनी आणि तिरंग्याच्या रंगांनी दुमदुमून गेले.

