दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे
संगमनेर : लाडकी बहीण योजनेचे हप्ते थोडेफार मागेपुढे झाले असले तरी ही योजना कधीही बंद होणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय देखील महायुतीच्या अजेंड्यावर आहे. सध्या थोडी तारेवरची कसरत करावी लागत असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे काल प्रथमच संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. सभेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर येथील जाणता राजा मैदानावर विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.