दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरच्या पाणी योजनेचे कोपरगाव कौतुक
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेरमध्ये दररोज पाणी येते, जे संगमनेरला जमले ते कोपरगावला का नाही? ” असा प्रश्न उपस्थित करणारे फलक कोपरगाव शहरात लागले आहे, त्यामुळे संगमनेरच्या पाणी योजनेची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. अहमदनगर जिल्ह्यात दररोज दोन वेळा पूर्ण दाबाने पाणी मिळणारे संगमनेर हे एकमेव शहर आहे.
शहरीकरणात पाण्याची उपलब्धता हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई जाणवते; रात्री-अपरात्री पाणी येते किंवा माती मिश्रित, अस्वच्छ पाणी पुरवले जाते. मात्र संगमनेर स्वयंपूर्ण आहे. पावसाळ्यातही अनेक शहरांना पाणीटंचाई भासते, पण संगमनेरमध्ये उन्हाळ्यातही दररोज दोन वेळा पूर्ण दाबाने पाणी येते. त्यामुळे संगमनेरची पाणी योजना कौतुकाचा विषय ठरली आहे. कोपरगावातील फलकांमुळे या योजनेची पुन्हा उजळणी झाली.