पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर शहरातूनच गेला पाहिजे, या मागणीकडे राज्य सरकारचे आणि विधिमंडळाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे (महायुती) आमदार अमोल खताळ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एक आगळेवेगळे आणि लक्षवेधी आंदोलन केले. त्यांनी 'पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे' या मागणीचे घोषवाक्य लिहिलेला टी-शर्ट परिधान केला तसेच हातात फलक घेऊन थेट विधानभवनात प्रवेश केला. या कृतीने विधानभवनातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि संगमनेरकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्या
शिर्डी मार्गे मार्गाला विरोध, संगमनेरकरांमध्ये संताप – नारायणगाव जवळील 'जीएमआरडी' (दुर्बीण) च्या तांत्रिक अडथळ्याचे कारण देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच लोकसभेत हा रेल्वेमार्ग शिर्डी मार्गे करण्याचे सूतोवाच केले होते. यामुळे संगमनेरकरांमध्ये तीव्र संताप आहे. या मार्गामुळे संगमनेर आणि परिसराचा विकास होणार असल्याने स्थानिकांची मागणी संगमनेर मार्गासाठीच आहे.
आमदार खताळ यांनी अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते.
आंदोलनानंतर बोलताना आमदार खताळ यांनी जनआंदोलनाची तयारी दर्शवित ते म्हणाले, हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच झाला पाहिजे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी हा मार्ग धोकादायक असल्याचे अचानक जाहीर केले. यासाठी कोणी आडकाठी आणत असेल, तर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याशी चर्चा झाली असून, राजकारणविरहित जनआंदोलन उभारले जाईल.

