दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार
अहिल्यानगर दि.२६- जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लर्निंग) वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील प्रथम क्रमांकाचा १० लक्ष रुपयांचा पुरस्कार अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना जाहीर झाला आहे. २०२४-२५ साठी शासकीय अधिकाऱ्यांमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले, तर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये राहाता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना यापुढच्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा राज्यात अनेक क्षेत्रात अग्रेसर असून त्यामागे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आहेत. जाहीर झालेल्या पुरस्काराने जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली असून या पुरस्कारामुळे इतरांनाही चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.