दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
इंदिरा नगरमधील ७७२ नागरिकांच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेरच्या इंदिरा नगरमधील रहिवाशांच्या घरांच्या नोंदीचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत प्रशासनाला धारेवर धरताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संगमनेरचे उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) जाधव यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. तांबेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इंदिरा नगरमधील सुमारे ७७२ नागरिकांच्या 'पोकळी हिस्से' नोंदीचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासन आता तीन दिवसांच्या अल्टिमेटमवर कामाला लागले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील सर्व्हे नंबर १०६ मधील ६० ते ६५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता नोंदीचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून अत्यंत पोटतिडकीने मांडला. उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी जाधव हे सर्वसामान्यांशी अरेरावीने वागत असून कायदेशीर नोंदी करण्यास राजकीय हेतूने किंवा जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अधिकाऱ्यांच्या या मुजोर वर्तनावर तांबे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.