दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
जल जीवन योजनेच्या साठवण तलावातील गौण खनिजाच्या वाहतुकीकडे डोळेझाक.
संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील जल जीवन योजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. मात्र पाणी साठवण्यासाठी खोदल्या जाणाऱ्या साठवण तलावातील कोट्यावधी रुपयाच्या माती व मुरमाची वाहतूक सुरू आहे . यामुळे सध्या ग्रामपंचायत व महसूल विभागातील अंतर्गत संघर्षामुळे या योजनेचे काम पूर्ण होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संगमनेर शहरा नजिक असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०२२ साली जलजीवन योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या योजनेचे कामही सुरू झाले. मात्र ग्रामपंचायत, ठेकेदार व जलजीवन प्राधिकरणाचे अधिकाऱ्यात वेळोवेळी शाब्दिक बाचाबाचीने हे काम रेंगाळले. मुदत संपुनही गेल्या तीन वर्षापासून या योजनेचे काम रखडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी घुलेवाडीकरांना वणवण करावी लागते.पाच ते सहा दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे.