दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
शरद पवारांचे ५० % लाडक्या बहिणींना तिकीट, स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी मोठी घोषणा....
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने शरद पवार गटातर्फे पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन महिलांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मुलींना सैन्यात संधी मिळताच त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने चांगले काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व दाखवतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे."
पुढे बोलताना ते म्हणाले, "एक काळ असा होता की पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व आणि भारत हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा देश म्हणून ओळखला जात होता. आज आपले पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्याशी संबंध चांगले नाहीत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मोठा त्याग केला, पण तो बांगलादेशही आज आपल्यासोबत नाही. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी सुसंवादाची परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे."
"राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डावे पक्ष असोत किंवा इतर पक्ष, सर्वांनी एकत्र येऊन दिल्लीत सुसंवाद निर्माण करायला हवा. कोणी आले किंवा गेले तरी फरक पडत नाही. आपण एकसंघ राहिलो तर सत्ता मिळते, हा अनुभव आहे. जयंत पाटील यांनी गेल्या आठ-दहा वर्षांत अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. त्यांनी नव्या पिढीला संधी देण्याची सूचना केली आहे. तुम्ही त्याला विरोध केला. जयंत पाटील यांच्याबाबत निर्णय घेताना पक्षातील सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. राज्यातील तालुका पातळीवर नवे नेतृत्व उभे केले जाईल," असेही शरद पवार यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवायच्या की स्वतंत्रपणे लढवायच्या, याचा निर्णय जिल्हा नेतृत्व घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालyanनंतर नव्या नेतृत्वाबाबत निर्णय घेतला जाईल. पुढील तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.